समर्थ रामदास: बालपणातील अद्भुत कथा

समर्थ रामदास स्वामींचे मूळ नाव नारायण ठोसर. त्यांचा जन्म जालन्याजवळील जांब या गावी झाला. त्यांच्या बालपणातील कथा आजही अनेकांच्या मनाला मोहवणाऱ्या आहेत, आणि त्यातील प्रत्येक प्रसंग त्यांच्यातील महान व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवतो. लपंडावाचा खेळ एकदा गावातील सर्व मुले लपंडाव खेळत होती. नारायणही त्यांच्या बरोबर खेळायला गेला. खेळ सुरु होताच नारायण एका ठिकाणी लपला आणि मग काही केल्या सापडला नाही. इतर मुले थकून गेली, सगळीकडे शोधून झाले, खेळही संपला, पण नारायण अजूनही गायबच होता. आखेर मुलांनी नारायणाच्या आईकडे धाव घेतली. “तुमचा नारायण कुठेच सापडत नाही,” हे ऐकून ती घाबरली. तिच्या मनात भयंकर विचार येऊ लागले. त्या काळात मुस्लिम राज्यकर्त्यांचे अत्याचार सुरू होते. त्यांचे सैनिक लहान मुलांना पळवून नेऊन त्यांना धर्मांतर करायला भाग पाडत असत.“माझ्या नारायणाला कुणी पळवून नेले तर नाही ना?” या विचाराने ती सुन्न झाली. डोळ्यांत पाणी आले आणि ती रडू लागली. गावाचा शोधमोहीम आईने गावातील लोकांना मदतीला बोलावले. सगळ्या घरांच्या भोवती, झाडांखाली, गोठ्यात, प्रत्येक कोपऱ्यात शोध सुरू झाला. गावातील लोकांनी तिच्या मनाला आधार दिला.“तो कुठेतरी घरातच असेल,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी तिला पुन्हा घरी जाऊन नीट शोधण्याचा सल्ला दिला. अद्वितीय शोध घरी परतल्यावर नारायणाची आई अधिक काळजीपूर्वक शोध घेऊ लागली. सगळे कपाट, खण, कोपरे तपासून झाले. अखेर एका मोठ्या कपाटाचा दरवाजा उघडताच नारायण तिच्यासमोर शांतपणे ध्यानस्थ अवस्थेत बसलेला दिसला.“नारायण!” आईने आश्चर्याने हाका मारल्या. ती आनंदाने त्याला मिठीत घेत होती. मात्र त्याच वेळी मनात प्रश्नही होताच—हा एवढ्या वेळ कपाटात काय करत होता? नारायणाचे विलक्षण उत्तर आईने विचारले, “मुला, तू इतका वेळ इथे काय करत होतास?”नारायणाने शांत स्वरात उत्तर दिले, “चिंता करितो विश्वाची.”त्याच्या या उत्तराने ती चकित झाली. एवढ्या लहान वयाचा नारायण संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची चिंता करत होता? ही गोष्ट अविश्वसनीय वाटत होती, पण तिच्या मुलाच्या डोळ्यांतील गूढ शांतता पाहून तिला कळून चुकले की त्याच्यात काहीतरी वेगळे आहे. बालपणातील थोरत्वाची ओळख हा प्रसंग ऐकून गावातील लोकही आश्चर्यचकित झाले. एका लहान मुलाने एवढ्या लहान वयात विश्वाच्या दुःखांवर विचार करण्याची क्षमता दाखवली होती. पुढे जाऊन हाच नारायण समर्थ रामदास स्वामी म्हणून ओळखला गेला, ज्यांनी महाराष्ट्राला धार्मिक आणि सामाजिक चेतना दिली. या प्रसंगातून समजते की थोर व्यक्तींच्या जीवनातील महानतेचे बीज त्यांच्या लहानपणीच दिसते. म्हणूनच लोक म्हणतात “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.”

Read more